पुणे : ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’तर्फे गणेश मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्माचे हे १५० वे वर्ष असल्याने गणेशोत्सवादरम्यान ही स्पर्धा होणार आहे’, अशी माहिती ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’चे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी दिली.
‘पुणे शहरात गणेशोत्सवात जी गणपती मंडळे राष्ट्रपिता महात्मा गांधींजींचे देखावे, व्याख्याने ठेवतील किंवा अन्य काही नाविन्यपूर्ण गोष्टी करतील, अशा मंडळांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. प्रथम क्रमांकास एक लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात येईल, तर गणेशात्सवात अधिक उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गणेश मंडळाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल’,असे डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सांगितले.
‘नाविन्य, परिणामकारकता काळानुरूप योग्य संदेश, ऐतिहासिक अचूकता हे स्पर्धेसाठी निकष असतील. आजच्या संदर्भात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा कोणता राष्ट्रीय विचार, कोणत्या प्रसंगातून अधोरेखित करणे आवश्यक आहे, याची निवड हा पारितोषिकासाठी महत्त्वाचा निकष असेल. पारितोषिक निवड समितीद्वारे स्पर्धेचे परिक्षण होईल आणि निकाल जाहीर करण्यात येईल. गणपती विसर्जनानंतर पंधरा दिवसांत पारितोषिके जाहीर केली जातील. त्यानंतर महिनाभरात पारितोषिक वितरणाचा जाहीर समारंभ होईल’, असेही डॉ. सप्तर्षी यांनी सांगितले.
‘इच्छुक गणेश मंडळांनी ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’, सर्व्हे नंबर. ३६, गांधी भवन, कोथरूड येथे अर्ज करावेत. संस्थेकडे अर्ज सादर होतील तेवढ्या गणेश मंडळांना निवड समिती प्रत्यक्ष भेट देईल’,असेही त्यांनी नमूद केले.